भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ढ :
विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्त्वात राहणे :
या भागामध्ये काहीही असले तरी, संविधान (त्र्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२, याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी एखाद्या राज्यामध्ये पंचायतींशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्यातील, या भागातील तरतुदींशी विसंगत असलेली कोणतीही तरतूद, सक्षम विधानमंडळाकडून किंवा इतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून सुधारित किंवा निरसित केली जाईपर्यंत किंवा अशा प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षे पूर्ण होईपर्यंत, यांपैकी जे अगोदरचे असेल तेथवर, अंमलात असण्याचे चालू राहील :
परंतु असे की, अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या सर्व पंचायती, त्या राज्याच्या विधानसभेने किंवा, त्या राज्याची विधानपरिषद असल्यास, त्या राज्याच्या विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहाकडून तशा आशयाचा ठराव मंजूर करून त्याद्वारे तत्पूर्वी विसर्जित केलेल्या नसल्यास, त्यांचा कालावधी समाप्त होईपर्यंत अस्तित्वात राहतील.
